Indian Railways भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्षे पूर्ण; हरित ऊर्जेसाठी नवा अध्याय सुरू

भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्षे पूर्ण; हरित ऊर्जेसाठी नवा अध्याय सुरू

नाशिक रोड, प्रतिनिधी देशातील शंभर टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करणे हे भारतीय रेल्वेच्या विद्युत विभागाचे प्राथमिक उद्देश आहे. व्यावसायिक तत्वावर काम करून वंदे भारत ट्रेन सारख्या प्रगत तंत्रज्ञानाला जोड देणारे उत्कृष्ट अभियंते तयार करणे हे इरिन पूर्ण करत आहे. त्या दृष्टीने इरिनने रेल्वे अभियंत्यांच्या अभ्यासक्रमात आधुनिकता आणावी, असे प्रतिपादन इरिनचे महासंचालक रविलेश कुमार यांनी केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भारतीय रेल्वे मार्गाच्या विद्युतकरणाला शंभर वर्ष पूर्ण झाली. त्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एकलहरे येथील भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थेत (इरीन) विविध कार्यक्रमांना होत आहे. त्या अनुषंगाने रविलेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

इरिनचे अपर महानिदेशक प्रमोद गद्रे, वरिष्ठ प्राध्यापक हरी राम, प्रा. श्रीनिवास चौधरी, जयराम खुर्सिजा, प्रा. अरविंद पाठक, प्रा. व्ही. के. रुलानिया, व्याख्याता वाय. के. मुलेवा, स्वीय सचिव महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

रविलेश कुमार म्हणाले की, रेल्वेच्या विद्युत विभागाला ३ फेब्रुवारी २०२५ ला शंभर वर्षे पूर्ण झाली. १९८६ मध्ये एकलहरे येथे इरिनची स्थापना झाली. १८७० मध्ये उत्तर अमेरिका व युरोपमध्ये विजेवर चालणारी रेल्वे सुरु झाली. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतात विजेवरील पहिली रेल्वे मुंबईत धावली. सरकारने पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे ठरवले आहे. भारतात सव्वा लाख किलोमीटरचे रेल्वे मार्ग आहेत. रेल्वेने २०१६-१७ पर्यंत साठ टक्के मार्गांचे विद्युतीकरण केले. या वर्षामध्ये संपूर्ण रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने वीजपुरवठा, रेल्वे इंजिनांची देखभालीसाठी अधिक विद्युत अभियंत्यांची गरज भासणार आहे. वाहतुकीमुळे प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीसाठी स्वच्छ उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ठ रेल्वेने ठवले आहे. २०३० पर्यंत भारतीय रेल्वे सौर उर्जेतून वीज तयार करण्यास प्राधान्य देणार आहे. त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होतील. रेल्वे विद्युतीकरणाचे हे शंभरावे वर्ष सुरु असल्याने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व समजण्यासाठी या उपक्रमात सामावून घेतले जात आहे. आगामी वर्षात डिझेलवरील रेल्वे इंजिन वाहतूक कमी होणार आहे. देशभरातील रेल्वेतील विद्युत अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याचे काम नाशिक रोडची इरिन संस्था करते. वंदे भारत ट्रेन आणि अवजड रेल्वे इंजिनाचे प्रशिक्षण इरीन यशस्वीपणे देत आहे. ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणा-या रेल्वेगाड्यांसाठी विजेचा पुरवठा वाढवावा लागणार आहे. या अधिक शक्तीशाली ट्रेनच्या देखभालीसाठी अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य इरीन करत आहे. भारतीय रेल्वे वापरत असलेले तंत्रज्ञान जागतिक दर्जाचे आहे. आपल्या शेजारील देशांनी त्यांच्या विद्युत अभियंत्यांना इरिनमध्ये प्रशिक्षणाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. ही गौरवाची बाब आहे.