भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामाबाबत मोठा अपडेट दिला आहे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी मान्सूनचे आगमन सुमारे ८ ते १० दिवस आधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून १३ मेपूर्वी अंदमान-निकोबार बेटांमध्ये दाखल होणार आहे, ज्यामुळे भारतात पावसाळ्याची लाट अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होईल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या अंदमान समुद्रावर मान्सूनसाठी अनुकूल हवामान तयार होत असून, हवेच्या दाबातील घट आणि समुद्राच्या पाण्याचे वाढलेले तापमान यामुळे मान्सूनचा वेग वाढला आहे. गेल्या ५० दिवसांपासून देशभरात तापमानात झपाट्याने वाढ झाल्यामुळे वातावरणातील बाष्प प्रमाण अधिक असून, बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरवर्षी १८ ते २२ मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा तो १० दिवस आधीच अंदमानात पोहोचणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ५ ते ६ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदा मान्सून लवकरच हजेरी लावण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. देशात सरासरीच्या १०५ टक्के पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज आहे. यामागे एल निनोचा प्रभाव नसणे आणि ला निनासारखे पोषक हवामान हे प्रमुख कारण असल्याचेही सांगण्यात आले.