Rajypal C.P.Radhakrushnan : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा नांदेडमध्ये विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांसोबत संवाद

Governor C.P. Radhakrishnan

Governor C.P. Radhakrishnan Engages in Dialogue with Delegations from Various Sectors in Nanded

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नांदेडमध्ये विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांसोबत विस्तृत संवाद साधला. या कार्यक्रमात शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथीय, सामाजिक संघटना आणि इतर नागरिक सहभागी झाले होते. राज्यपालांनी तब्बल अडीच तास नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर योग्य उपाय सुचवले. त्यांच्या संयमी आणि समाधानकारक संवादामुळे उपस्थित शिष्टमंडळांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपाल आज सायंकाळी ५ वाजता अमरावतीवरून नांदेड विमानतळावर दाखल झाले, जिथे त्यांना सन्मानाने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांनी लगेच संवाद कार्यक्रमाला सुरुवात केली. या संवादात सर्वप्रथम नांदेड येथील खासदार आणि माजी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला गेला. राज्यसभेचे सदस्य आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार भीमराव केराम, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, माजी आमदार गंगाधरराव पटने आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते.

शिष्टमंडळाने विविध विषयांवर मागण्या मांडल्या. पिकविमा योजनेची व्याप्ती वाढवणे, नांदेडहून मुंबईला विमानसेवा सुरू करणे, नांदेड-लातूर आणि नांदेड-बिदर रेल्वे सेवा सुरू करणे, आदिवासी भागातील विकासाला वनविभागाच्या कायद्यामुळे होणाऱ्या अडचणी, लेंडी प्रकल्पाचे रखडलेले काम आणि बाभळी बंधाऱ्याचा मोबदला मिळणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. याशिवाय, मराठा आरक्षण, मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या संधींमध्ये आरक्षण देणे, धार्मिक भावना भडकवणाऱ्यांवर कारवाई, आणि नांदेडमध्ये मोठ्या उद्योग समूहांना आकर्षित करण्याचे विषयदेखील मांडले गेले.

शासकीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळदेखील राज्यपालांना भेटले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध विकास योजनांचे सादरीकरण केले. यात आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, गृहनिर्माण, आदिवासी विकास, आणि महिलांसाठीच्या योजनांचा समावेश होता. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळही या संवादात सहभागी झाले. त्यांनी आत्महत्येचे वाढते प्रमाण, गोपालकांना मिळणारे अनुदान, आणि शेतीशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली. राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने ऐकल्या आणि शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ डॉक्टरांनीदेखील राज्यपालांना भेट दिली आणि त्यांच्या व्यवसायातील समस्या मांडल्या. त्यानंतर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनीदेखील आपले मुद्दे मांडले, ज्यात नांदेडमध्ये उद्योग वाढविण्यासाठी अधिक सुविधा पुरविण्याची मागणी केली. यावेळी राज्यपालांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशीही संवाद साधला आणि पॅराओलिम्पिक खेळाडूंशी फोटो घेतले.

माध्यम प्रतिनिधींसोबतही राज्यपालांनी संवाद साधला. विद्यापीठातील अध्यासन, वैधानिक विकास मंडळाची स्थापना, आदिवासींच्या समस्या, रेल्वेमधील बंद झालेले आरक्षण, मुस्लिम समाजासाठी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, ग्रामीण पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना, आणि कम्युनिटी किचन यांसारख्या विषयांवर माध्यम प्रतिनिधींनी चर्चा केली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या संवाद कार्यक्रमाचे कौतुक केले आणि या प्रकारच्या संवाद कार्यक्रमातून नागरिकांचे प्रश्न समजून घेता येतात, असे मत व्यक्त केले. राज्यपालांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना मुंबईत येऊन भेट घेणे शक्य नसल्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात जाऊन संवाद साधणे महत्त्वाचे आहे. यामुळे राज्य शासनालाही काही समस्या लक्षात आणून देता येतात, असे ते म्हणाले. नांदेडच्या जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपालांना मराठी आणि हिंदी भाषेत संवाद साधताना अडचण येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत अनुवादक म्हणून काम करत होते. राज्यपालांनी सर्वांना त्यांच्या भाषेतच संवाद साधण्याचे आवाहन केले.

Leave a Reply