निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील काथरगाव येथे महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहाच्या बिघाडामुळे येथील सहा ते सात एकर ऊस शेतीला आग लागून जवळपास २० एक र असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कै लास विश्वनाथ काळे, दिगंबर भाऊसाहेब वाघ, राजेंद्र अण्णासाहेब वाघ, रामचंद्र माधव वाघ, जगन्नाथ काशिनाथ काळे, किरण जगन्नाथ वाघ आदींसह ६ शेतकऱ्यांची वीस एकरावर एकाच ठिकाणी ऊस शेती आहे. रविवारी (दि.१०) वीज तारांच्या घर्षणाने पेट घेतला व आगीने संपूर्ण उसाचे क्षेत्र आपल्या भक्ष्यस्थानी गिळंकृत करत असताना येथील ग्रामसेवक सुनील शिंदे यांनी त्वरित या घटनेची दखल घेत निफाड नगरपंचायतीकडे असलेल्या अग्निशामक दलास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व घटनेचे गांभीर्य समजावून सांगत लागलीच अग्निशामक बंब पाठवण्याची विनंती केली. परंतु ‘असून अडचण नसून खोळंबा’ या काव्यपंक्तीप्रमाणे निफाड
नगरपंचायतीकडे अग्निशामक बंब उभा होता, परंतु त्यासाठी चालक नसल्याने चालकास निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी कळवण येथे कामानिमित्त पाठवले असल्याचे समजते. त्यामुळे अग्निशामक बंबास चालक नसल्याचे सांगण्यात आले.
अग्निशामक बंब हा लागलीच काथरगाव येथे गेला असता तर जवळपास ७० ते ८० टक्के ऊस आगीपासून वाचला असता. परंतु शेतकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणायचे की निफाड नगरपंचायत प्रशासन
विभागाच्या नाकर्ते कारभारामुळे संबंधित शेतकऱ्यांना आपली लाखो रुपयांची ऊस शेती गमवावी लागल्याची दुर्दैवी घटना घडली. महावितरण कंपनीने या विद्युत तारांचा त्वरित बंदोबस्त करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी काथरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. निफाड प्रशासन, शासन ऊस उत्पादकांच्या या लाखो रुपयांच्या नुकसान भरपाई बाबत काय भूमिका घेते, याकडे तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.