महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांनी गृहमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, फडणवीस आणि भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नसल्याने महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गृहमंत्रीपदाचा वाद
एकनाथ शिंदे यांचे शिवसेना गट गृहमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. मात्र, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “शिवसेनेने गृहमंत्रीपदासाठी कुठलाही हट्ट धरलेला नाही. माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. आम्ही महायुतीतील भाजपाच्या निर्णयाला पाठिंबा देतो.”
शिंदेंचा त्याग आणि भाजपाला पाठिंबा
भरत गोगावले यांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद नाकारले आहे. भाजपाला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरणं योग्य ठरत नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “भाजपाचा मुख्यमंत्री असेल, तर आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ. गृहमंत्रीपदावरून उभ्या राहणाऱ्या चर्चांना काहीही अर्थ नाही.”
भाजपची पुढील रणनीती
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
खातेवाटपावर महत्त्वाची बैठक
एकनाथ शिंदे रविवारी साताऱ्यातील दरे या मूळ गावाहून ठाण्यात परतले आहेत. सोमवारी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी महायुतीतील खातेवाटपावर आणि संभाव्य मंत्रिमंडळाच्या नावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महायुतीतून काय ठरेल?
सत्तास्थापनेच्या या वादात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद निश्चित झाले असले तरी खातेवाटप आणि गृहमंत्रीपदाच्या वादावर महायुतीतील अंतिम तोडगा काय निघतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो, परंतु शिंदे गटाचे समर्थन मिळाल्याशिवाय सत्तेचा डाव पूर्ण होणार नाही.