Kumbh Mela 2027 – त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा सुरक्षित आणि दुर्घटनारहित पार पडण्यासाठी गर्दी नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. साधूग्रामसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांनी दिले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी अधिकारी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव डॉ. चहल यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या वेगाने पार पाडाव्यात. घाट, नदीपात्राची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे. गर्दी नियोजनासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने भक्कम बॅरिकेट्स उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल का, याचा विचार करून पोलिसांनी त्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कामांच्या प्रस्तावांची पूर्तता करावी, असे निर्देश दिले.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कुंभमेळ्याच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले असून त्यांचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनीही त्यांच्या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांचा अहवाल सादर केला.

मुख्यमंत्र्यांचा लवकरच आढावा बैठक
येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री स्वतः कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेणार असल्याने, सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि वेगाने कार्य करावे, असेही चहल यांनी स्पष्ट केले.
२०२७ चा कुंभमेळा यशस्वी आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून, आगामी काळात या कामांना गती देण्यावर भर दिला जाणार आहे.