नाशिक – सुळेवाडी, तवलीफाटा, गंधारवाडी, काकड मळा, सुळेवाडीतील पिंगळे मळा आणि तांदळे मळा या परिसरातील शेतकरी सध्या बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे भीतीच्या छायेत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने पुन्हा या भागात वावर सुरू केला असून, विशेषतः सायंकाळी ९ ते १० या वेळेत बिबट्याचे दर्शन हे नित्याचेच ठरले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मंगळवारी १ ऑक्टोबरला रात्री नऊच्या दरम्यान सोमनाथ पिंगळे यांच्या मळ्यात गाई आणि म्हशींच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव केला. अचानक बिबट्याचे आगमन झाल्याने गाई-म्हशींनी जोरजोराने हंबरायला सुरुवात केली. गोठ्याजवळ असलेल्या कुत्र्यांनी मोठ्या आवाजात भुंकल्यामुळे पिंगळे कुटुंब खडबडून जागे झाले. घराचा दरवाजा उघडताच बिबट्या त्यांना दिसला, परंतु घरातील सदस्यांना पाहताच बिबट्याने पलायन केले.
पिंगळे कुटुंबीयांनी लगेच चार ते पाच फटाके फोडून आणि बॅटरीच्या प्रकाशाने बिबट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. या घटनेत पिंगळे कुटुंबीयांनी पाळलेला तीन कुत्र्यांपैकी एक कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात मारला गेला. उर्वरित दोन कुत्र्यांनी स्वतःला मोटरसायकलच्या आड दडवून घेतल्याने ते बचावले, असे पिंगळे कुटुंबीयांनी सांगितले.
“संध्याकाळच्या वेळी बिबट्याच्या भीतीमुळे मळ्यात जाणे आता शक्यच होत नाही,” सुळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना आता बिबट्याच्या दहशतीचा सामना करावा लागत असून, वनविभागाने लवकरात लवकर या प्राण्याच्या संचारावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
वनविभागाने त्वरीत उपाययोजना न केल्यास शेतकरी आणि मळ्यातील जनावरांचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज आहे.