उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याचे प्रमुख कारण माफियाराज?
महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी उत्सुक असलेले अनेक उद्योग ऐनवेळी इतर राज्यांकडे वळत आहेत. यामागे अनेक कारणे असली तरी माफियाराज (Mafia) हे एक मोठे आव्हान ठरत आहे. बीडमधील थर्मल पॉवर प्रकल्पातील राखेवरील माफियाराज असो किंवा नाशिकमधील स्क्रॅप माफियांची दहशत, हे दोन्ही उद्योगांसाठी धोक्याचे संकेत आहेत.
मुंबई-पुण्यातही माफियांची (Mafia)पकड मजबूत
राज्याची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईतील MIDC भागात मोठ्या कंत्राटांसाठी माफियांची (Mafia)स्पर्धा पाहायला मिळते. पुण्यातही हीच परिस्थिती असून उद्योजकांना खंडणी, धमक्या आणि जबरदस्तीच्या करारांना सामोरे जावे लागत आहे.
विदर्भातील खनिज माफियांचा अंमल – उद्योजक त्रस्त
महाराष्ट्राच्या ७०% खनिज क्षेत्र असलेल्या विदर्भातही माफियाराजचे वर्चस्व आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कोळसा, मॅग्निज, लोहखनिज, कॉपर ओअर आणि डोलोमाइट यांसारख्या मौल्यवान खनिजांची तस्करी सर्रास सुरू आहे. परिणामी, येथे गुंतवणूक करणाऱ्या उद्योगपतींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उद्योग वाढीसाठी माफियाराज मोडीत काढणे आवश्यक
माफियांच्या दहशतीमुळे अनेक नवीन उद्योग महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत स्थायिक होत आहेत. उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफियांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) कारवाईचा इशारा दिला आहे, त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे माफियांचे फावते?
उद्योगांमध्ये माफियांचे राजकीय संबंध अधिक घट्ट होत चालले आहेत. काही लोकप्रतिनिधी थेट माफिया बनले आहेत, तर काही माफियांना पाठबळ देत आहेत, असा आरोप उद्योजकांकडून होत आहे. त्यामुळे सरकारने माफियांना पोसणाऱ्या राजकारण्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
उद्योजकांचे मत
“उद्योगांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. पोलिसांनी तक्रार मिळाल्यास त्वरित कारवाई करावी.“
– आशिष नहार, अध्यक्ष, निमा, नाशिक
पोलीस प्रशासनाचा विश्वास
“उद्योजकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना सुरू आहेत. कोणीही त्रास देत असल्यास त्वरित तक्रार करावी, कारवाई केली जाईल.“
– संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
– उद्योग वाढीसाठी माफियाराज नष्ट होणे गरजेचे
महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरण राखण्यासाठी माफियाराज मोडीत काढणे अनिवार्य आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी मिळून त्वरित कठोर पावले उचलल्यासच महाराष्ट्र हे देशातील सर्वांत सुरक्षित औद्योगिक केंद्र राहू शकते.