Maharashtra Kesari 2025: उपांत्य आणि अंतिम फेरीत गोंधळ; शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड निलंबित

Maharashtra Kesari

Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Mahendra Gaikwad: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. रविवारी (2 फेब्रुवारी) अहिल्यानगरमध्ये झालेल्या या स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने अंतिम विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2025 चा किताब पटकावला. मात्र, या सामन्यादरम्यान मोठे वादंग निर्माण झाले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

उपांत्य फेरीत पंचांशी वाद, शिवराज राक्षेचे निलंबन

उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील सामना अवघ्या 40 सेकंदांत संपला. पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित करताच शिवराज राक्षे, त्याचे प्रशिक्षक आणि समर्थकांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. शिवराजने रिव्ह्यूची मागणी केली, मात्र पंचांनी ती फेटाळली. यावर संतप्त झालेल्या शिवराजने पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि एका पंचाला लाथ मारल्याची घटना घडली. परिणामी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे.

अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा वाद, पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी

उपांत्य फेरीतील गोंधळानंतर अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. सामन्यादरम्यान हाफ टाइमला महेंद्र गायकवाड पंचांशी वाद घालू लागला. पंचांनी योग्य निर्णय दिला नसल्याचा आरोप करत त्याने शिवीगाळ केली आणि थेट मैदान सोडून निघून गेला. या वर्तनामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करत त्याच्या हाती महाराष्ट्र केसरी गदा सोपवली.

शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड निलंबित

स्पर्धेदरम्यान गैरवर्तन केल्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित केल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केली.

शिवराजची मागणी – “रिव्ह्यू करा, पराभव मान्य करेन”

शिवराज राक्षेने आपल्या निलंबनाविरोधात आवाज उठवत सामन्याचा रिव्ह्यू करण्याची मागणी केली आहे. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझे खांदे जमिनीला टेकल्याचे दिसल्यास मी माझा पराभव स्वीकारेन.”

महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा गोंधळाने गाजली

महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेतील पंचांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कुस्तीप्रेमींमध्ये मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. भविष्यात अशा वादग्रस्त निर्णयांपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.