परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर – उद्योगमंत्री उदय सामंत

Maharashtra Leads in Foreign Investment: A Boost for Industrial Development

राज्य शासनाने औद्योगिक विकासासाठी घेतलेले पाऊल अधिक गतीमान होत असून, महाराष्ट्र आता परकीय गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यांत सुमारे 75 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नाशिक येथील हॉटेल डेमोक्रॅसीमध्ये आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, नामांकित उद्योजक धनंजय बेळे, संदीप सोनवणे, कांतिलाल चोपडा, अजय बोरस्ते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळे, सहसंचालक श्री. शेळके, कार्यकारी अभियंता श्री. पवार, व्यवस्थापक अतुल दवंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध लाभार्थ्यांना मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते धनादेश आणि नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, राज्य शासनाने औद्योगिक विकासात गती आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. औद्योगिक प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती जलदगतीने करण्यात येत आहे. विशेषत: अंबड औद्योगिक क्षेत्रासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच, नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, येथील उद्योगांच्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तेथे स्टील हब विकसित केला जात आहे. या प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच, नाशिक जिल्ह्यात देखील लवकरच एक मोठा औद्योगिक प्रकल्प साकारला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कृषीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विशेष योजना राबविल्या जात आहेत, तसेच मोठ्या उद्योजकांबरोबरच लघु उद्योगांनाही आवश्यक कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातून कोणताही उद्योग बाहेर गेला नसून, उलट नवी मुंबईतील महापे येथे जेम्स ऍण्ड ज्वेलरी पार्क साकारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील भरारीबाबत समाधान व्यक्त करताना, “राज्याने औद्योगिक क्षेत्रात घेतलेली भरारी ही आनंदाची बाब आहे. उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अधिक उपाययोजना होणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी, “गेल्या दोन वर्षांत राज्याने पुन्हा औद्योगिक क्षेत्रात भरारी घेतली आहे. अनेक नवीन उद्योगांची राज्यात भर पडत असून, यामुळे औद्योगिक सक्षमीकरण होत आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांची उभारणी होत आहे. शासनाने उद्योजकांना योग्य मार्गदर्शन आणि सन्मान मिळवून दिला आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योजक धनंजय बेळे यांनी, “महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे,” असे मत व्यक्त केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, “उद्योग भरारी हा उपक्रम मंत्री श्री. सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील उद्योगक्षेत्र अधिक समृद्ध होईल. नाशिक औद्योगिक क्षेत्राने या उपक्रमातून प्रेरणा घेत राज्यातील इतर उद्योग क्षेत्रांसाठी आदर्श निर्माण केला आहे.”

प्रादेशिक अधिकारी नितीन गवळे यांनी आभार प्रदर्शन करत, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply