नाशिक: जुन्या नाशिकमधील कोकणीपुरा प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या आगमनाने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने एकाच वेळी घटनास्थळी पोहोचल्याने कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महात्मा फुले मंडईजवळील रस्त्यावर दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. अचानक सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापले, परंतु पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलद प्रतिसाद पथक आणि भारत-तिबेट दलाच्या कमांडोंनी गर्दी पांगवली.
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी हजेरी लावून परिस्थिती शांत केली. देवयानी फरांदे यांना विनंती करून दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगण्यात आले, तर गिते यांचे वाहन वेगळ्या दिशेने हलवण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या दिवशी अशाच प्रकारच्या परिस्थितीत तणाव निर्माण झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी पोलिसांनी जलद प्रतिसाद दाखवून परिस्थिती शांत केली. सायंकाळपर्यंत या भागात पोलिस आणि कमांडो तैनात ठेवण्यात आले.
नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या वादाला थारा देऊ नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असून, कुठल्याही अनुचित प्रकारास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.