नाशिक – महापालिका (NMC) आयुक्त मनिषा खत्री यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा करण्याचा संकल्प व्यक्त केला असला, तरी सध्याच्या स्थितीत ‘एनएमसी ई-कनेक्ट’ ॲपवर नागरिकांच्या तक्रारींचा प्रचंड ढीग साचलेला आहे. महापालिकेच्या (NMC) विविध विभागांशी संबंधित तब्बल २,५७७ तक्रारी अद्याप प्रलंबित असून, त्यापैकी सर्वाधिक १,२६८ तक्रारी अतिक्रमण विभागाच्या नावे आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
NMC तक्रारींची संख्या वाढण्यामागील कारणे?
महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमुळे नगरसेवकांची भूमिका नाहीशी झाल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी थेट प्रशासनावर येऊन पडली आहे. परिणामी, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवल्या जात असल्या तरी त्यावर वेगाने तोडगा निघत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘एनएमसी ई-कनेक्ट’ ॲप कार्यप्रणाली
या ॲपवर नोंदवलेल्या तक्रारी आपोआप ४९ विभागांकडे पाठविल्या जातात आणि आठ दिवसांत सोडवण्याची अपेक्षा असते. मात्र, अनेक तक्रारी महिनोनमहिने प्रलंबित राहत आहेत.
कोणत्या विभागाच्या किती तक्रारी?
- अतिक्रमण: १,२६८
- सार्वजनिक बांधकाम: १८३
- घनकचरा व्यवस्थापन: २५२
- नगररचना: १७७
- उद्यान: ८५
- मलनि:सारण: १११
- झोपडपट्टी सुधारणा: ६६
इतर पोर्टल्सवरही महापालिकेच्या तक्रारी प्रलंबित
महापालिकेशी (NMC) संबंधित तक्रारी केवळ ‘एनएमसी ई-कनेक्ट’ ॲपपुरत्याच नाहीत, तर शासनाच्या इतर पोर्टल्सवरही नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित आहेत.
सचिवालय स्तरावर: १० तक्रारी
- नगरनियोजन: ५
- अतिक्रमण: ४
- बांधकाम: १
विभागीय आयुक्त स्तरावर: १७ तक्रारी
- अतिक्रमण: ३
- नगरनियोजन व भूसंपादन: ३
- शिक्षण: २
- बांधकाम: ५
- विभागीय कार्यालय पंचवटी: १
- घनकचरा व्यवस्थापन: २
- पाणीपुरवठा: १
पीजी पोर्टलवर: १२ तक्रारी
- बांधकाम: १
- उद्यान: ३
- विभागीय कार्यालय पूर्व: ४
- पंचवटी: ३
- पाणीपुरवठा: १
आपले सरकार पोर्टलवर: २८ तक्रारी
- पशुसंवर्धन: १
- आरोग्य: २
- नगरनियोजन: ४
- विभागीय कार्यालये: २०
- माहिती व तंत्रज्ञान: १
आयुक्तांचा तक्रार निवारण प्रणाली सुधारण्याचा निर्धार
महापालिका (NMC) आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी तक्रारींचा वेगाने निपटारा करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी खातेप्रमुखांच्या विशेष बैठकीत तक्रारींचा आढावा घेण्यात आला असून, भविष्यात तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारली जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवर महापालिका प्रशासन किती जलद कार्यवाही करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.