जुने नाशिक- शहरातील द्वारका, मुंबई नाकासह विविध भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी विविध कामासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. अशा मार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. त्यातच महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात खड्डयांची समस्या अधिक प्रमाणात भेडसावू नये. यासाठी आत्तापासूनच महापालिकेने नियोजन करत रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावा. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेले विविध कामे, ड्रेनेज पाइपलाइन, भूमीगत केबल टाकण्याचे कामे. अशा एक ना अनेक कारणांनी चांगले असलेले रस्ते खोदले जात आहे. कामे होऊनही बरेच दिवस खड्डे तसेच पडून राहतात. तर काही ठिकाणचे खड्डे निकृष्ट पद्धतीने बुजविले जात आहे. यातच वाहतुकीमुळे पुन्हा ते खड्डे उघडकीस येतात.
अशा पद्धतीने रस्त्यांना जागोजागी खड्डे दिसून येतात. त्याचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. यातच अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे, मोठे अपघाताच्या घटना घडत आहे.
सध्या मुंबई नाका, द्वारका, शालीमार, वडाळा नाका अशा विविध मुख्य रस्त्यांवर खोदकामामुळे रस्त्यांना खड्डे पडलेले दिसून येत आहे. खड्डयांपासून बचावासाठी वाहनचालक त्यांचे वाहन सावकाश करत असतात. त्यामुळे इतर वाहतूकही सावकाश होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे चाकरमाने आणि स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन दिवसापासून शहरात पाऊस सुरू आहे. त्यातूनही रस्त्यांवरील खड्डे उघडे पडले आहेत. अशा वेळेस खड्डयांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघाताचे प्रमाण आणि नागरिकांना जाणवणारी समस्या दूर करण्यासाठी महापालिकेकडून आत्तापासूनच अनावश्यक खोदकामे थांबवून तसेच रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहे.