राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या उद्योजकीय तसेच व्यक्तिगत कर्तृत्वाचे स्मरण केले आहे. रतन टाटा हे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपल्या कार्याने, शिस्तीने आणि समाजसेवेच्या निस्वार्थ वृत्तीने जगभरात आदर्श निर्माण केला. त्यांची तुलना “श्रीमंत योगी” अशीच केली जाऊ शकते कारण त्यांनी संपत्ती असतानाही ती मिरवण्यापेक्षा साधेपणाने जीवन जगणे पसंत केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
रतन टाटा यांनी २१व्या शतकात टाटा समूहाला नवे वळण दिले. त्यांनी टीसीएस, टाटा मोटर्स, जॅग्वार-लँड रोव्हर यासारख्या कंपन्यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय उद्योगाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचबरोबर “नॅनो” सारखी परवडणारी कार आणि टाटा हाऊसिंग यांसारखे उपक्रम सुरु करून सर्वसामान्य भारतीयांचे स्वप्न साकार केले.
राज ठाकरे यांच्या आणि रतन टाटांच्या वैयक्तिक नात्याचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, त्यांच्या अनेक संकल्पनांना रतन टाटांनी नेहमीच पाठिंबा दिला. विशेषत: नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनसाठी दिलेला निधी आणि नंतर स्वत: ते पाहण्यासाठी नाशिकला येणे, हे त्यांच्या दातृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.
त्यांचे श्वानप्रेमदेखील अनेकांना माहित आहे. बॉम्बे हाऊस आणि ताज हॉटेलमध्ये श्वानांसाठी केलेली विशेष सोय किंवा त्यांच्या श्वानांच्या आजारपणामुळे बकिंगहॅम पॅलेसमध्ये होणारा मोठा सन्मान सोडणे हे दाखवते की, रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते. अशा कर्तृत्ववान आणि संवेदनशील उद्योजकाचे या जगातून जाणे ही भारतासाठी मोठी हानी आहे.