Sharad Pawar : “साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप: संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांचा शरद पवार गटात प्रवेश, अजित पवार गटाला मोठा धक्का”

ajit Pawar

Latest News: विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल राज्यात तापलेला आहे. निवडणुका काहीच दिवसांवर आल्यामुळे सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेची संभाव्यता असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यभरात विविध नेते दौरे आणि सभा घेत असून, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मोर्चेबांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राजकीय वातावरणात चांगलेच तापल्याचं दिसत आहे . त्यामुळे आगामी काळात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे .

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

साताऱ्यातील आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. संजीवराजे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे, ज्यामुळे फलटणमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, मात्र तरीही चव्हाण यांनी शरद पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवारांच्या गटाला या भागात मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. फलटणमध्ये झालेल्या सभेत, शरद पवारांच्या उपस्थितीत संजीवराजे आणि दीपक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश पार पडला.

संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षांतराचे कारण सांगताना, “मी मनाने शरद पवारांच्या बाजूला होतो, तरीही शरीराने दुसऱ्या बाजूला होतो. मात्र हा निर्णय मी नाही, तर कार्यकर्त्यांनी घेतला आहे. दिल्लीतील नेत्यांनी साम, दाम, दंड, भेद वापरायची सूचना केली होती, पण आपण स्वाभिमानी आहोत आणि दिल्लीसमोर झुकणारे नाहीत,” असे ठामपणे सांगितले.

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भवितव्याबाबतही मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता. विधान परिषदेचे सभापती असलेल्या रामराजे यांनी महायुतीबरोबर काम करण्यास आपली इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांचा पक्षबदल होण्याची शक्यता बळावली आहे, आणि महायुतीच्या प्रचारातून ते बाजूला राहणार असल्याचे बोलले जात आहे.

या सगळ्या घडामोडींनी साताऱ्याचे राजकारण आणि आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शरद पवार गटाने या घडामोडींमुळे बळ मिळवले असून, अजित पवारांच्या गटासाठी हे मोठे आव्हान बनले आहे.