Latest News : महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विविध क्षेत्रांतील समस्यांची माहिती घेतली तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल, यावर चर्चा केली. राज्यपालांनी जिल्ह्यातील कृषि, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, आणि राजकारणाशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी या क्षेत्रांतील व्यक्तींशी थेट संवाद साधून त्यांची मते आणि अडचणी जाणून घेतल्या.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्यपालांच्या या दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय वन अधिकारी धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील शिक्षण, पर्यटन, उद्योग, वर्धा नांदेड रेल्वे मार्ग, विविध महामार्ग प्रकल्प, घरकुल योजना, आणि अन्य महत्त्वाच्या योजनांची माहिती राज्यपालांना दिली.
राज्यपालांनी आदिवासी कल्याणासाठी सुरु असलेल्या पीएम जनमन योजनेबाबतची माहिती घेतली तसेच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी आणि सेवा हमी कायद्याबद्दलच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. त्यांनी यावेळी अनेक विकासात्मक योजनांबाबत चौकशी केली आणि त्या योजनांची अंमलबजावणी नागरिकांच्या हितासाठी उत्तम प्रकारे करण्यात यावी, असे निर्देश दिले.
या बैठकीनंतर राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. कृषि क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा करताना त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि या क्षेत्राच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधून त्यांनी जिल्ह्यातील उद्योगांचे सध्याचे स्वरूप आणि अडचणी जाणून घेतल्या.
राज्यपालांनी आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींशी देखील चर्चा केली. आयुर्वेदासारख्या पारंपारिक वैद्यक पद्धतीला चालना देण्याची आवश्यकता या क्षेत्रातील लोकांनी मांडली. याशिवाय, विविध क्रीडा प्रकारातील गुणवंत खेळाडूंशी देखील संवाद साधून त्यांनी त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही लोकांशी चर्चा करताना जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे यवतमाळ आगमन झाल्यावर त्यांचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी स्वागत केले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.