नाशिक – केवळ सत्तेसाठी राजकीय भूमिका खुंटीवर टांगून महाराष्ट्रात स्थापन केलेला महाविकास आघाडीचा अनैतिक प्रयोग पुरता फसल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कमालीचे नैराश्य आले आहे. महाराष्ट्राला नव्या विकासाच्या दिशेने नेणारे महायुती सरकार कसेही करून अस्थिर करून राज्यात अराजक माजविण्याकरिता राष्ट्रपुरुषांना वेठीस धरण्यापर्यंत या वैफल्यग्रस्तांची मजल गेली आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील दुर्दैवी घटनेचे राजकारण करून सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या विरोधकांवर कारवाई करा, अशी स्पष्ट मागणी आज प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली नाशिक भारतीय जनता पार्टी मुख्यालय वसंत स्मृती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या वेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सोशल मीडिया सायोंजक प्रकाश गाडे, नाशिक भाजप महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, महानगर सरचिटणीस सुनील केदार , नाशिक शहर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शरद पवार यांच्या प्रलोभनाला बळी पडून मुख्यमंत्रीपद बळकावलेल्या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात एकही नवा विकास प्रकल्प आला नाहीच, उलट सुरू असलेल्या प्रकल्पांना स्थगिती देऊन व अनेक प्रकल्प रद्द करून त्यांनी राज्याला दहा वर्षे मागे नेले. अशा निष्क्रीय व कर्तृत्वहीन सरकारने केवळ स्वार्थी भ्रष्टाचारासाठी राबविलेली सत्ता हातून गेल्यावर मलिदा बंद झाल्याने पिसाळलेले हे नेते आता महाराष्ट्रात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप उपाध्ये यांनी केला. बदलापूरच्या दुर्घटनेतही राजकारण आणून दंगली पेटविण्याचा प्रयत्न फसल्यावर आता राजकोट किल्ला दुर्घटनेला राजकीय रंग देण्याचा कट शिजत असून या अस्वस्थांनी राज्यातील शांतता धोक्यात आणण्याचा चंग बांधला आहे, अशी टीका त्यांनी केली. शरद पवार यांच्या पक्षाचे काही नेत्यांना सोबत घेऊन सिंधुदुर्गात आदित्य ठाकरे यांनी तोच प्रयत्न करून पाहिला पण तो फसल्यामुळे आता नेत्यांची नवी कुमक कामाला लागली आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. राज्य अस्थिर करून जनतेमध्ये विद्वेष पसरविण्याचा कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नका, असे आवाहन उपाध्ये यांनी राज्य सरकारला व पोलिसांना केले आहे. हीन राजकारणासाठी राष्ट्रपुरुषांचा सन्मान वेठीला धरण्याचे प्रयत्न राज्यातील जनता सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी केशव उपाध्ये यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली