कोल्हापूर, – राज्य शासनाने गरीब, महिलांना, जेष्ठ नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सहाय्यकारी असलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांद्वारे त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे कार्य केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे आयोजित संत समावेश कार्यक्रमाच्या समारोपीय चर्चासत्रात ते बोलत होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समाजाला जागृत करण्याचे कार्य हजारो प्रबोधनकार करीत आहेत. अशा प्रबोधनकारांच्या कार्यामुळे शासनाने सुरू केलेल्या महत्त्वकांक्षी योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळावा, जेणेकरून समाजात एक सकारात्मक बदल घडवून येईल. त्यांनी गोमातेच्या संरक्षणासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे महत्त्व अधोरेखित केले. गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान देण्याची योजना लवकरच राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व असून, देशी गायीला राज्य माता म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जेष्ठ नागरिकांच्या योजनांसह विविध लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा, बळीराजांचा, वारकऱ्यांचा आणि कामगारांचा विकास होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
शासनाने ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरू केली आहे, ज्यामुळे ५ कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. यामुळे शासकीय कार्यालयात लोकांची कामे प्रलंबित राहण्याची शक्यता कमी झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “जनता माझी ताकद आहे आणि मी त्यांच्यासाठी काम करणारा एक सर्वसामान्य माणूस आहे. आपण पर्यावरण संरक्षण, तापमान वाढीवरील नियंत्रण, सेंद्रीय शेती यांसारख्या विविध मुद्द्यांवर कार्य करणे आवश्यक आहे.”कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांचा तुळशी हार देऊन आणि गोमाता दान करून विशेष सत्कार करण्यात आला. समारोपानंतर त्यांनी उपस्थित सर्व प्रबोधनकार, स्वामी, हभप यांची निवेदनं स्वीकारली आणि विविध विषयांवर चर्चा केली. उपस्थित महिला प्रबोधनकारांनी त्यांचे औक्षणही केले.
मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर विमानतळावर आगमनास जिल्हा प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., खासदार धैर्यशील माने, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे समाजातील विविध घटकांना एकत्रित आणून शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे लागू करण्यात मदत होईल, असे अपेक्षित आहे.