पुलाला रंगरंगोटी व नव्या रिफ्लेक्टरची तातडीची गरज
वाहनांच्या धुराने काळवंडलेला परिसर, सौंदर्याला लागलेली ओरखडे
Nashik Road | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलाचे लोकार्पण होऊन तब्बल २० वर्षे उलटली, तरीही पुलाला साजेशी देखभाल मिळालेली नाही. उड्डाणपुलाचा खालील भाग काळवंडलेला असून, खांबांवर जाहिरातीच्या कागदांनी व पोस्टरने परिसर विद्रूप झालेला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Road पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष, दुभाजक व कठड्यांची दयनीय अवस्था
पुलावर पाणी निचरा होणारी व्यवस्था धोकादायक स्थितीत असून, रस्त्यावरील दुभाजक व रिफ्लेक्टर झिजले आहेत. संरक्षक कठडे व कठड्याच्या भिंती देखील मोडकळीस आल्या आहेत. या दृष्टीने ठाणे व मुंबईच्या धर्तीवर पुलाला रंगरंगोटी करून परिसराचे सौंदर्य वाढवण्याची गरज आहे.
मित्रमेळाच्या पुढाकाराने मागणीला वेग
मित्रमेळा संस्थापक राजेंद्र ताजणे यांच्या नेतृत्वाखाली रमेश पाळदे, किरण डहाळे, दौलत शिंदे, सागर वाकचौरे, अरुण निरगुडे, भाईदास चव्हाण आदींनी एकत्र येत महापालिकेला निवेदन सादर केले. त्यांनी पुलावर रंगरंगोटी करून दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना नवीन रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी केली आहे.
व्यवसायवृद्धीला मिळू शकतो हातभार
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना बाजारपेठ आहे. त्याखाली भाजीबाजार व इतर दुकाने थाटलेली असून, स्वच्छ व रंगीत परिसरामुळे व्यवसायालाही चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी व्यक्त केला आहे.