हरिहर किल्ल्यावर गर्दीवर नियंत्रण! आता रोज फक्त 300 पर्यटकांनाच प्रवेश

Crowd control at Harihar Fort! Now only 300 tourists are allowed to enter daily

नाशिक :
वर्षासहलीच्या हंगामात होणारी प्रचंड गर्दी, सोशल मीडियामुळे वाढलेला हव्यास, आणि वाढते अपघात यामुळे हरिहर किल्ल्यावर वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. या लोकप्रिय गडावर आता दररोज केवळ 300 पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला किल्ला ठरला आहे, ज्याची कॅरिंग कॅपेसिटी (भारवहन क्षमता) अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रील्सची क्रेझ, गर्दीचा कहर

हरिहर किल्ला गेल्या काही वर्षांत इंस्टाग्राम रील्स, ट्रेकिंग व्हिडिओ आणि सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाला आहे. याचाच परिणाम म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पर्यटकांची झुंबड गडावर पाहायला मिळते.
चढाई धोकादायक असूनही, अनुभव नसलेले अनेक पर्यटक केवळ सोशल मीडियासाठी गड चढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते.

वन विभागाचा सक्त आदेश

पर्यटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने पुढील नियम लागू केले आहेत:

  • दररोज फक्त 300 पर्यटकांनाच प्रवेश
  • दुपारी 2 नंतर प्रवेश बंद
  • दुपारी 4 नंतर कोणीही गडावर थांबू शकणार नाही
  • मोठे गट असल्यास 72 तास आधी 9420352395 वर संपर्क करून पूर्वनोंदणी आवश्यक

मद्यपान वर्तनावर कडक निर्बंध

वन विभागाने हरिहरगड, ब्रह्मगिरी, अंजनेरी, दुगारवाडी धबधबा आणि नेकलेस फॉल (पहिने) या ठिकाणांना मद्यपानमुक्त क्षेत्र घोषित केले आहे.

  • मद्यपान करणाऱ्यांना थेट प्रवेश नाकारण्यात येईल
  • सुरक्षारक्षक वा गाईडसोबत गैरवर्तन केल्यास कठोर कारवाई केली जाईल

प्रयोग यशस्वी

वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी सांगितले की, “प्रवेश मर्यादा लावल्याच्या पहिल्याच आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनावश्यक गर्दीही टळली.”