नाशिक: महानुभाव पंथाच्या ऐतिहासिक ग्रंथांचे संरक्षण आणि संवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठी भाषा विद्यापीठाच्या सहाय्याने या ग्रंथांचे संगणकीकरण करून त्यांचे कायमस्वरूपी संवर्धन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कवी कालिदास नाट्यमंदिरात अखिल भारतीय महानुभाव पंथाच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी महानुभाव पंथाच्या कार्याचा गौरव करताना समाजाला दिलेल्या अतुलनीय योगदानाचे कौतुक केले.
त्यांनी सांगितले की, महानुभाव पंथाने समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आणि समतेचे मूल्य रुजवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे. चक्रधर स्वामींचे विचार समाजातील विषमता कमी करण्यासाठी प्रेरणादायी आहेत.
रिद्धपूर येथे मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ स्थापन करण्यात आल्याचे नमूद करताना फडणवीस यांनी विद्यापीठासाठी शासनाच्या वतीने आवश्यक निधीची हमी दिली. याशिवाय, पंथाच्या महत्वाच्या स्थळे आणि मंदिरांच्या विकासासाठी शासनाच्या वतीनेही सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी चिरडे बाबा, अविनाश ठाकरे, कारंजेकरबाबा यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.