दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ : पंढरपूर वारीत अनोखी जनजागृतीची संकल्पना ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

Dindi is about awareness – disaster management: A unique public awareness concept is becoming the center of attraction in Pandharpur Wari

मुंबई : महाराष्ट्राची धार्मिक व सामाजिक एकतेची शान असलेल्या आषाढी वारीत यंदा ‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ ही अभिनव संकल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती – चित्ररथांच्या माध्यमातून

वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण अशा नैसर्गिक आपत्तींबाबत सजगता निर्माण करण्यासाठी चार चित्ररथ, पथनाट्य पथके, माहिती स्टॉल्स, मोबाईल व्हॅन आणि सोपी भाषेतील माहितीपत्रकांचा वापर करून मार्गदर्शन केले जात आहे.
“संकटाला घाबरू नका, सज्ज राहा!” हा सकारात्मक संदेश देणारी ही दिंडी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

१९ जूनपासून ६ जुलैपर्यंत विशेष मोहीम

या उपक्रमासाठी एकूण ६० जणांची टीम सज्ज असून, १९ जूनपासून सुरू झालेली ही जनजागृती मोहीम आषाढी एकादशी – ६ जुलै पर्यंत वारीमध्ये चालणार आहे. चित्ररथांवर विठ्ठल-रखुमाईची छायाचित्रे, वारकरी परंपरेचे चित्रण आणि आपत्ती व्यवस्थापन उपायांची दृश्यात्मक मांडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे वारीतील आध्यात्मिकतेसह सुरक्षिततेचाही संदेश प्रभावीपणे दिला जात आहे.

वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्यांच्या मागे येणाऱ्या असंख्य दिंड्यांमध्ये ही माहिती पोहोचवली जात आहे. वारकऱ्यांनी चित्ररथ आणि माहिती स्टॉल्सला चांगला प्रतिसाद दिला आहे, तसेच “सजग व सुरक्षित वारी” ही संकल्पना आता वारकऱ्यांच्या मनात रुजताना दिसत आहे.

सामाजिक बांधिलकीचा आदर्श

या उपक्रमातून फक्त आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञानच नव्हे, तर संकट काळात कशी प्रतिक्रिया द्यावी, आपला आणि इतरांचा जीव कसा सुरक्षित ठेवावा, कोणती खबरदारी घ्यावी – याचेही प्रभावी प्रबोधन होत आहे. हा उपक्रम म्हणजे शासनाची सामाजिक बांधिलकी आणि नागरिक सहभागाचा उत्तम संगम असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.