पेठ तालुक्यातील आढावा बैठकीत गोंधळ; ठेकेदार संघटनेची जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार
नाशिक |
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Jal Jeevan Mission Nashik – जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत पेठ तालुक्यात 17 जून रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदारांशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, काही ठिकाणी मारहाणीचा प्रयत्नही झाला असल्याचे ठेकेदार संघटनेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटदार संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिमा मित्तल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
“ठेकेदारांना संरक्षण द्या” – संघटनेची मागणी
या तक्रारीसह कंत्राटदारांना संरक्षण मिळावे, बैठका जिल्हा स्तरावरच घेण्यात याव्यात आणि मासिक जिल्हा परिषद सभेत मुद्दा मांडावा, अशी ठाम मागणी ठेकेदार संघटनेने केली आहे. अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष मनोज खाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सीईओंची भेट घेतली.
शिष्टमंडळात खजिनदार मुसा खाटीक, सचिव योगेंद्र जाधव, श्रीराम काश्मिरे, योगेश जगताप, मनोज नागरे, भास्कर वाघ, ललित जोशी, अविनाश मोहिते, अनिष पाटील, विनय कुवर यांचा समावेश होता.
“निधीअभावी कंत्राटदार अडचणीत, एकतर्फी हस्तांतरण करा” (Jal Jeevan Mission Nashik)
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की:
- निधीअभावी अनेक कामे रखडली आहेत, तरीही बऱ्याच योजनांवर दंडाशिवाय मुदतवाढ दिली जावी.
- पूर्ण झालेल्या योजनांचे ग्रामपंचायतीकडे एकतर्फी हस्तांतरण करण्यात यावे.
- 9 ते 10 महिन्यांपासून थकलेल्या देयकांची तात्काळ पूर्तता करावी.
स्थानिकांकडून स्पष्टीकरण : मारहाण झाली नाही
दुसरीकडे, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी निकृष्ट कामांबाबत विचारणा झाली होती, परंतु अरेरावी किंवा मारहाणीचा प्रकार घडलेला नाही.