Krishna Katha : कोटमगाव कन्हैया नगरीत गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीमद्भागवत कृष्ण कथा (Krishna Katha) सोहळ्याचा भव्य समारोप भक्तिमय वातावरणात झाला. कृष्णकथाकार परमपूज्य महंत मानसशास्त्री यांच्या सखोल ज्ञानाने व प्रभावी वाणीने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
समाजप्रबोधनासह आध्यात्मिक संदेश (Krishna Katha)
महंत मानसशास्त्री यांनी केवळ धार्मिक कथा सांगण्यावर भर न देता, भगवद्गीता आणि मानसशास्त्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी सांगितले की, “आजचा माणूस फळाच्या अपेक्षेने कार्य करतो आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यास निराश होतो. पण भगवद्गीता सांगते – कर्म करत राहा, त्याचे फळ परमेश्वराच्या इच्छेवर सोडा. हा दृष्टिकोन स्वीकारल्यास आयुष्यात तणाव आणि दुःख कमी होईल.”
श्रीकृष्णाच्या लीला – भक्तांची श्रद्धा (Krishna Katha)
सात दिवसांच्या या प्रवचनात भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांपासून कंसवधापर्यंतच्या घटनांचे हृदयस्पर्शी चित्र उभे करण्यात आले. कृष्णजन्माच्या प्रसंगी कारागृहातील अंधार, मुसळधार पाऊस आणि वसुदेवांच्या बलिदानाचे वर्णन ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले. गोवर्धन पूजनाचा संदर्भ देत, “प्रकृतीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे,” असा महत्त्वाचा पर्यावरण संदेश दिला.
कुटुंबसंस्थेचा सुदृढ पाया
महंत मानसशास्त्री यांनी कुटुंबसंस्था, नातेसंबंध आणि संवादाच्या महत्त्वावर भर दिला. महाभारतातील कौरव-पांडव संघर्षाचा दाखला देत, “धन, सत्ता आणि अहंकाराने माणूस माणसापासून दुरावत आहे. नाती टिकवण्यासाठी संवाद, समर्पण आणि प्रेम या तीन गोष्टी आवश्यक आहेत,” असा मौलिक संदेश दिला.
तरुणांसाठी गीतेचा मार्गदर्शन
“आजचा तरुण तणाव, निराशा आणि दडपणाखाली वावरतो. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवून जात आहे. पण त्याला खरी गरज आहे आत्मशोधाची आणि गीतेच्या तत्त्वज्ञानाची.” असे सांगत भगवद्गीतेच्या अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त केली. “कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर गीतेचा उपदेश दिला. आपणही जीवनाच्या रणांगणात असतो. योग्य मार्ग निवडला, तर जीवन आनंदी होईल.”
नारीशक्तीचा गौरव
महंत मानसशास्त्री यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील नारीशक्तीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. “भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला. आजच्या समाजात महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. मुलींना शिकवले पाहिजे, त्यांना आत्मनिर्भर बनवले पाहिजे, तरच खरे श्रीकृष्ण भक्त होऊ शकतो,” असे सांगत त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.
‘हरे कृष्ण’ च्या गजराने परिसर दुमदुमला
संपूर्ण सप्ताहभर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या प्रवचनांचा लाभ घेतला. ‘हरे कृष्ण’च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. हा भव्य सोहळा प्रकाश घुगे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महिनाभर येथे प्रवचन, कृष्ण कथा, भजन संध्या आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.