जलवाहिनी दुरुस्ती अपयशी; पंचवटी, काठे गल्ली, नांदूर-दसक परिसरात पाणीपुरवठा ठप्प
नाशिक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Water Crisis – सततच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आठवड्यात दोनवेळा पूर आला असतानाही नाशिककरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जलवाहिन्यांतील एअर ब्लॉक आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे पंचवटी, काठे गल्ली, नांदूर-दसक, टकलेनगर या भागातील सलग पाचव्या दिवशीही नळ कोरडेच राहिले. परिणामी महापालिकेवर टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची नामुष्की ओढवली आहे.
शटडाऊनचा उलट परिणाम, एअर ब्लॉक ठरतोय डोकेदुखी
स्मार्ट सिटी अंतर्गत जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी 21 जूनला घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा शटडाऊनमुळे अनेक भागांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली. जुन्या पंपिंग स्टेशनवरील 900 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधील गळती दुरुस्त करताना दोन दिवस पंपिंग बंद ठेवले गेले. त्यामुळे संपूर्ण शहरात जलपुरवठा विस्कळीत झाला.
एअर ब्लॉकमुळे केवळ 60% पाणीपुरवठा (Nashik Water Crisis)
एअर ब्लॉकमुळे नीलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रातून फक्त 60 टक्के क्षमतेने पाणी वितरित होत आहे. पंचवटी, नांदूर-दसक, काठे गल्लीसारख्या परिसरात अजूनही पाणी पोहचलेले नाही. महापालिकेने 12 टँकरद्वारे आपत्कालीन पाणीपुरवठा सुरू केला आहे. पण भाग मोठा असल्याने अनेक ठिकाणी टँकर पोहचू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेविरुद्ध रोष वाढला आहे.
माजी नगरसेवक मैदानात; टँकरने मदतीचा हात
पाण्याअभावी त्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. माजी नगरसेविका शीतल माळोदे व अॅड. नितीन माळोदे यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. आडगाव, धात्रक फाटा, कोणार्कनगर, महालक्ष्मीनगर, श्रीरामनगर, त्रिवेणी संगम परिसरात नागरिकांना दिलासा देण्यात येत आहे.
दुरुस्ती युद्धपातळीवर, पण समाधान नाही
जलवाहिन्यांतील एअर ब्लॉक हटवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सलग पाचव्या दिवशीही समस्या कायम आहे. नागरिकांनी महापालिकेकडून अधिक तत्परता आणि परिणामकारक योजना राबवण्याची मागणी केली आहे.