भूसंपादन मोबदला, ठेकेदारांना झुकते माप, गोदावरी नदी प्रदूषण यावर आंदोलन
NMC : नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. भूसंपादन मोबदला, ठेकेदारांना झुकते माप, गोदावरी नदी प्रदूषण आदी विषयांवरून काँग्रेसने महापालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
NMC : आंदोलनाचे नेतृत्व आणि मागण्या
हे आंदोलन काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, वसंत ठाकूर, सचिव राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलकांनी प्रशासनावर 350 हून अधिक नागरिकांना भूसंपादनाचा मोबदला न देता केवळ 11 बांधकाम व्यावसायिकांना 55 कोटी रुपयांचे वाटप केल्याचा आरोप केला. यासोबतच, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नसताना, मोठ्या ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रशासनाच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवला असल्याचे आरोप करण्यात आले.
मनपाच्या प्रशासनावर गंभीर आरोप
नाशिक महानगरपालिकेत गेल्या 24 वर्षांत एकही भरती झालेली नाही, त्यामुळे नागरी सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याआधी सर्व संवर्गातील पदे लवकरात लवकर भरावीत, अशी काँग्रेसने मागणी केली आहे.
अन्य महत्त्वाच्या मागण्या
- फेरीवाला क्षेत्राची निर्मिती व सर्वेक्षण करून जागा निश्चित करावी.
- सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा.
- सिंहस्थासाठी 500 एकर जागेचे कायमस्वरूपी संपादन करण्यात यावे.
- सुरळीत पाणीपुरवठा व नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
- मोकळ्या जागांवर वाहनतळ उभारण्यात यावेत.
- जिल्ह्यातील नदीत मिसळणारे सांडपाणी त्वरित थांबवावे व सांडपाण्याच्या वाहिन्या बंद कराव्यात.
- कुंभमेळा नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय अध्यक्ष व नागरिकांचा समावेश करण्यात यावा.
मनपाला निवेदन सादर
यासर्व मागण्यांसह नाशिक काँग्रेसने महानगरपालिकेला निवेदन देऊन प्रशासनाच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांचे नुकसान होत असून, त्वरित योग्य ती पावले उचलली जात नसल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर काँग्रेसने गंभीर आरोप करत प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नागरी समस्या आणि अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाने यावर काय भूमिका घेतली, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.