बांगलादेशकडून आयात थांबविल्याचा परिणाम – कांद्याचे दर १,२०० ते १,५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
लासलगाव (नाशिक) : Onion Export Crisis भारतीय कांदा निर्यातीसाठी मुख्य बाजार मानल्या जाणाऱ्या बांगलादेशकडून मागील तीन महिन्यांपासून अचानकपणे सीमा बंद ठेवण्यात आली आहे. या अघोषित आयातबंदीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम देशातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर झाला आहे.
कांद्याच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता केवळ ₹१,२०० ते ₹१,५०० प्रति क्विंटल एवढाच दर मिळतो आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे बाजारभाव घसरत चालले आहेत.
कांदा निर्यातीची आकडेवारी आणि धोरणात्मक परिणाम (Onion Export Crisis)
भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी ४०% हून अधिक कांदा बांगलादेशात निर्यात केला जातो. २०२४-२५ आर्थिक वर्षात सुमारे ४.८० लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशात गेला होता, ज्यातून ₹१,७२४ कोटी रुपयांचे परकीय उत्पन्न देशाला मिळाले होते.
मात्र सध्या बांगलादेशने भारतीय कांद्यावर अघोषित निर्बंध लावल्यामुळे शेकडो ट्रक दररोज निर्यात होत असलेल्या नाशिक, लासलगाव, सोलापूर, पुणे व आहिल्यानगर भागातील कांदा बाजारपेठांवर गंभीर परिणाम झाला आहे.
शेतकरी-व्यापाऱ्यांचे आर्थिक संकट
रब्बी हंगामात भरघोस कांदा उत्पादन झाल्यानंतरही निर्यात बंद झाल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे. नाफेडकडून खरेदी सुरू असली तरी ती अपुरी ठरत आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शेतकरी संघटना आणि व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडे बांगलादेशसह कांदा निर्यातीसंबंधी त्वरित राजनैतिक प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.