मुंबई: सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा महाराष्ट्र सरकारने तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत कर्नाटकी सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. बेळगाव, निपाणी आणि इतर सीमाभागांतील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटकी सरकारने विरोध केला, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटकी विधानसभेतील प्रतिमा काढण्याचा निर्णय घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी भाषिकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेसाठी हा लढा चालूच राहील. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने कार्यरत आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाटकी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठी भाषिकांच्या मेळाव्याला विरोध करणे अन्यायकारक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना अटक आणि लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्याची कृती निषेधार्ह आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी मीही तुरुंगवास भोगला आहे. आम्ही यावर न्यायालयीन पातळीवर ठोस कारवाई करीत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात पावले उचलण्यात येत असून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.