नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक बुधवारी देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीत पक्षाचे वरीष्ठ नेते व आमदार उपस्थित होते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर निर्णय घेण्यासाठी २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
बैठकीत वादग्रस्त जागांवर चर्चा होणार असून, यावर तोडगा निघाला नाही तर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी ७० जागांवर दावा करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यात त्यांनी मागील विधानसभेत मिळवलेल्या ५४ जागांपेक्षा १५ जागा अधिक मागण्याची रणनीती आखली आहे.
आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्यामुळे प्रचार रणनीतीवर देखील चर्चा करण्यात आली. महायुतीच्या सदस्यांना स्थानिक पातळीवर एकत्र येण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच, जर एखाद्या आमदाराचा निवडणूक सर्व्हे निगेटिव्ह आला तर त्या जागी त्याच पक्षातील दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले.
बैठकीत महामंडळ वाटपावरुन काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचेही स्पष्ट झाले.