महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले आहे, आणि विविध राजकीय घडामोडी वेगाने पुढे सरकत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना, आता राज्यात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटनेला भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असून, आगामी विधानसभा निवडणुकीत हा पक्ष सहभाग घेणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या नव्या पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे, आणि छत्रपती संभाजीराजे यांनी या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावरून करत कार्यकर्ते व समर्थकांसोबत आनंद शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष राज्याच्या राजकारणात एक नवा व सुसंस्कृत पर्याय देण्यास सज्ज आहे आणि पक्षाच्या उमेदवारांना आगामी निवडणुकीत मोठे यश मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “स्वराज्य संघटना आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून ओळखली जाईल, आणि निवडणूक चिन्ह मिळाल्याने पक्ष अधिक जोमाने निवडणुकीसाठी सज्ज होईल.” त्यांच्या या नव्या पक्षाच्या उदयामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.