महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी असताना गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली. गुन्हेशाखा युनिट-२ नाशिकच्या विशेष कारवाईत हे करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश हत्या आणि वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. याच मोहिमेंतर्गत सपोउनि गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पाथर्डीफाटा ते राणेनगरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एक महिंद्रा जिनोओ वाहन (क्रमांक MH 43 AD 4951) गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून वाहन थांबवले.
वाहन चालक अनिल बाळू मुर्तडक (वय ३२, रा. ईगतपुरी, जि. नाशिक) व त्याच्या शेजारी असलेले दोन इसम अशोक सुनिल नेटावटे (वय ३२) आणि अजिम नजीर शेख (वय २९) यांना ताब्यात घेण्यात आले. गाडीत एक गाय आणि दोन वासरं आढळून आली. चौकशीअंती या जनावरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
सदर प्रकरणी ३,६०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे, सपोउनि गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, यशवंत बेंडकोळी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, अतुल पाटील आणि वाहतुक शाखेचे योगेश रेवगडे यांनी केली.