नाशिक | नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्कतेमुळे एक अल्पवयीन मुलगी सुरक्षित स्थळी पोहोचली. संशयास्पद परिस्थितीत फिरणाऱ्या या मुलीला चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
20 जानेवारी रोजी, हेड कॉन्स्टेबल निर्मला सुर्यवंशी या कर्तव्यावर असताना रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर एक 15 वर्षीय मुलगी घाबरलेल्या आणि संभ्रमित अवस्थेत फिरताना दिसली. त्यांनी तात्काळ तिच्याशी संवाद साधला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिला आरपीएफ RPF पोलीस ठाणे, नाशिक रोड येथे आणण्यात आले.
येथे उपनिरीक्षक रविंद्र कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्य सायली बेदरकर आणि हिमांशु वनिस यांना बोलावले. त्यांनी मुलीशी प्रेमाने संवाद साधत विचारपूस केली असता, तिने आपले नाव सरिता गोविंद बिंद (वय 15, जिल्हा अमोई, मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असल्याचे सांगितले. घरगुती नाराजीमुळे कोणालाही न सांगता ती घर सोडून आल्याची माहिती तिने दिली.
यानंतर उपनिरीक्षक रविंद्र कुमार यांनी सरिताचे वडील गोविंद बिंद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दुसऱ्या दिवशी नाशिकला येऊन मुलीला ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले.
सुरक्षेच्या दृष्टीने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून तिला बालकल्याण समिती, ऊंटवाडी, नाशिक येथे सुपूर्त करण्यात आले.
आरपीएफच्या (RPF) सतर्कतेमुळे आणि त्वरित कारवाईमुळे ही मुलगी सुरक्षित स्थळी पोहोचली असून, लवकरच तिच्या परिवाराशी पुनर्मिलन होणार आहे.