नाशिक | १५ ऑगस्ट २०२४ (Nashik Guardian Minister): स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून राजकीय संघर्ष चिघळला आहे. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार” असा दावा ठोकत वातावरण तापवले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी “जिल्ह्यात आमचे सात आमदार असताना पालकमंत्रीपद आमच्याकडेच यावे” असा ठाम आग्रह धरला आहे.
पालकमंत्रीपदावरून कलगीतुरा
१५ ऑगस्टच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर नाशिकमध्ये महाजन आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक वाद रंगला. त्यानंतर हा वाद अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावमध्ये प्रतिक्रिया देताना, “पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हे मुख्यमंत्री ठरवतील. यावरून वाद करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट केले.
पार्श्वभूमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. त्यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी गिरीश महाजन यांची निवड झाली होती. मात्र शिंदे गटाच्या विरोधामुळे दुसऱ्याच दिवशी ही घोषणा स्थगित करण्यात आली. त्यानंतर महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे.
गिरीश महाजन यांचा दावा (Nashik Guardian Minister)
धुळे येथील दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहताना महाजन म्हणाले :
“मी दरवर्षी नाशिकला जातो आणि तिथे मीच पालकमंत्री होणार आहे. यावर कोणतीही शंका नाही.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकच्या राजकारणात नवे वादळ उठले असून, महाजन यांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळ यांची प्रतिक्रीया
जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले :
“नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार आहेत. एका आमदारासाठीही आपण पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतो, मग सात आमदार असताना हा आग्रह स्वाभाविकच आहे. मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी याबाबत बोलणार आहे.”