स्थानिक नागरिकांचा नगरपरिषद प्रशासनावर तीव्र रोष
Bhagur Garbage Management Protest : भगूर शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाविरोधात स्थानिक नागरिक आणि महिलांनी तीव्र आंदोलन छेडले. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकून त्याला आग लावली. त्यानंतर हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन नगरपरिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Bhagur कचरा जाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भगूर नगरपरिषदेकडून दारणा नदीच्या किनारी आणि मंगळवार आठवडे बाजार परिसरात गावातील सर्व कचरा डंप केला जातो. मात्र, हा कचरा वेळोवेळी जाळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
नागरिकांना आरोग्य समस्यांचा सामना (Bhagur )
या धुराचा प्रचंड त्रास नागरिकांना होत असून, गेल्या आठवडाभरात विषारी वास आणि धुरामुळे लहान मुले, महिला आणि वृद्धांना दम्याचे झटके, सतत खोकला आणि श्वसनासंबंधी गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “कचऱ्याला जाणून-बुजून रात्रीच्या वेळी आग लावली जाते, त्यामुळे झोपेत असताना विषारी धूर नाकातोंडात जातो आणि सकाळी त्रास जाणवतो. हा प्रकार सातत्याने सुरू असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.”
नगरपालिकेच्या निष्क्रियतेवर संताप (Bhagur)
नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून फायर ब्रिगेडची गाडी विकत घेतली असली, तरी कचऱ्याला आग लागल्यावर त्वरित कार्यवाही केली जात नाही. भगूर गावाची हद्द केवळ ४ किलोमीटर असूनही, आग विझवण्यासाठी तासनतास विलंब होतो. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल रोष व्यक्त केला.
लोकवस्तीमध्ये कचरा डंप करण्याचा अधिकार?
स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, लोकवस्तीमध्ये कचरा डंप करण्याचा अधिकार नगरपालिकेला आहे का? जर नाही, तर हा कचरा त्वरित हटवून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. तसेच, जर नगरपालिकेकडे पुरेशी साधने नसतील, तर त्या भाडेतत्त्वावर किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेऊन उपाययोजना कराव्यात.
नागरिकांनी दिले निवेदन
हे निवेदन भगूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखने, कार्यालयीन अधिक्षक पल्लवी सूर्यवंशी, सिद्धेश मुळे यांना देण्यात आले.
आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग
निवेदन देतेवेळी प्रेरणा बलकवडे, प्रतिभा भवार, सुमन गवळी, रेवती सोनवणे, शोभा पाटोळे, दीपक भांगरे, स्नेहल काळे, कमल वाघ, रेखा निर्मळ, संगीता भंडारी, उज्वला गवळी, शिल्पा वराडे, दीपा घोरपडे यांच्यासह पाचशेहून अधिक नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा!
नागरिकांनी नगरपरिषदेकडे कचऱ्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.