नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील ई वाहन धोरणाच्या अंमलबजावणीला चालना देत नाशिक विभागात ई बससेवेचा विस्तार केला आहे. नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटर लांबीच्या वातानुकूलीत ई बस सुरू केल्यानंतर, आता सप्तश्रृंगी गड, कसारा, आणि पिंपळगाव मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या नव्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक विभागातील महामंडळाने नऊ मीटर लांबीच्या ई बस सेवा सप्तश्रृंगी गड आणि नाशिक-कसारा मार्गावर यापूर्वीच सुरू केली होती. आता याच मार्गांवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन सहा अतिरिक्त फेऱ्या सप्तश्रृंगी गड मार्गावर, दोन फेऱ्या नाशिक-कसारा मार्गावर, तर आठ फेऱ्या नाशिक-पिंपळगाव मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.
नवी ई बस सेवा वातानुकूलीत असून, प्रवाशांना आरामदायी प्रवासाची खात्री देते.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
बसमध्ये उच्च दर्जाची प्रकाशयोजना उपलब्ध आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी ५०% सवलत
ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०% सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १००% सवलत
अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती, शहीद जवानांच्या वीरपत्नी तसेच विद्यमान व माजी आमदार, विधान परिषद सदस्य यांना १००% सवलत
महाराष्ट्र सरकारने पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ई वाहन धोरण अंमलात आणले असून, त्याअंतर्गत नाशिक विभागात ई बस सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येत आहे. नुकत्याच दाखल झालेल्या १२ वातानुकूलीत बसमुळे महामंडळाचा ई बस ताफा वाढला आहे. या बसमध्ये एकूण ४४ आसनांची क्षमता असून, प्रत्येक प्रवाशाला आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
नाशिक – सप्तश्रृंगी गड मार्गावर अनेक भाविक प्रवास करतात, तर कसारा व पिंपळगाव मार्ग प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाचा आहे. या नव्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची सोय होणार असून, वेळेची बचतही होईल. सध्या नाशिक-बोरिवली मार्गावरील ई बससेवेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे महामंडळाने या सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.