Prayagraj Kumbh Mela : प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना २००३ मधील कुंभमेळ्यातील हृदयद्रावक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. त्या दुर्घटनेत २९ भाविकांचा बळी गेला होता. यानंतरच्या २०१५-१६ च्या कुंभमेळ्यात पोलिसांनी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा राबवली होती. आता आगामी कुंभमेळ्यातही पोलिसांकडून तशीच सुरक्षा यंत्रणा राबवली जाणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना सतावत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
२००३ च्या दुर्घटनेनंतर नाशिकमध्ये पंचवटीत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला होता. यासाठी सुमारे ३५ एकर जागा मंजूर झाली, परंतु ही जागा गायरान आणि वनखात्याच्या मालकीची असल्याने वनखात्याने आक्षेप घेतला आहे. या जागेची किंमत सुमारे ३४८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
म्हसरूळ येथे हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी आपले श्रेय असल्याचा दावा केला होता. मात्र, जागेच्या वादामुळे प्रकल्प अडकला असून आता कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. तज्ज्ञांच्या मते, शासनाने वनखात्याला पर्यायी जागा देऊन हा प्रश्न सोडवावा, पण निवडणुका आणि मंत्रिपदाच्या धावपळीत हा विषय दुर्लक्षित राहिला आहे.
पोलिसांनी २०१५-१६ च्या कुंभमेळ्यात रामकुंड परिसरासह संपूर्ण शहर बॅरिकेडने सील केले होते. परिणामी, स्थानिक नागरिकांनाही स्नानासाठी नदीपर्यंत पोहोचता आले नाही. नागरिकांची मागणी आहे की सुरक्षेच्या नावाखाली भाविकांना गोदास्नानापासून वंचित करू नये.
कुंभमेळ्यास अवघी दोन वर्षे शिल्लक असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा वाद आणि पोलिसांची संभाव्य रणनीती यावर सरकारने त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.