Nashik News | NMC Latest Updates | NMC News Nashik
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात सिध्दार्थनगर आणि संत कबीरनगर झोपडपट्टीवासीयांनी सोमवारी (दि. १८) राजीव गांधी भवनासमोर भव्य मोर्चा काढला. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्च्यात झोपडपट्टीवासीयांनी “आमची घरे वाचवा, झोपडपट्ट्या अधिकृत करा” अशी घोषणाबाजी केली.
झोपडपट्टीवासीयांचा आक्रोश
झोपडपट्टीवासीयांनी स्पष्ट मागणी केली की, शासनाने या वस्त्या अधिकृत स्लम घोषित कराव्यात आणि झोपडीधारकांना त्याच ठिकाणी पक्की घरे बांधण्याची परवानगी द्यावी. तसेच महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन कारवाई तत्काळ थांबवून रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही मोर्चादरम्यान करण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व व निवेदन
मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, युवक महानगरप्रमुख रवि पगारे आणि महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड यांनी केले. झोपडपट्टीवासीयांनी आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदनही सादर केले.
न्यायालयाचा आदेश व महापालिकेची कारवाई
गंगापूर उजव्या कालव्याच्या जागेवर उभारलेल्या या झोपडपट्ट्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला १२ आठवड्यात अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षण करून अहवाल तयार केला असून अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यामुळे झोपडपट्टीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घर वाचविण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन हा जनआक्रोश मोर्चा काढला.
झोपडपट्टीवासीयांच्या प्रमुख मागण्या (NMC News Nashik)
- अतिक्रमण निर्मूलन कारवाई तत्काळ थांबवावी
- झोपडीधारकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात
- झोपडपट्ट्या अधिकृत स्लम घोषित कराव्यात
- झोपडीधारकांना पक्की घरे मिळावीत