दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्टेशन हेल्थ ऑफिसरच्या मदतीने मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा उद्देश सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा आहे. दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत असल्याने दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या मिठाईच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सर्व खाद्य विक्रेत्यांसाठी बंधनकारक आहे, आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी तपासणी करण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
ही मोहीम स्टेशन हेल्थ कारवाई अधिकारी कर्नल डॅनियल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत आरोग्य अधीक्षक संजय ठुबे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधिकारी अमन गुप्ता, मयूर सोदे, शुभम शेंडगे आदी अधिकारी देखील सहभागी होते. त्यांनी सदर बाजार, विजय नगर, रेस्ट कॅम्प रोड या भागातील प्रमुख मिठाई विक्रेत्यांना भेट देऊन त्यांच्या दुकानातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी केली.
तपासणीदरम्यान, मिठाई विक्रेत्यांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन केले आहे का, हे पाहिले जात आहे. यामध्ये मिठाईच्या उत्पादनासाठी वापरलेले दूध, साखर, तुप, खवा इत्यादी घटकांच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात आली. दुकानदारांनी आपापल्या वस्तूंवर उत्पादनाची तारीख व समाप्ती तारीख स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे, यावर देखील तपासणी दलाने भर दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला गेला.
सणाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिठाई विक्री होते, आणि त्यामुळे नफा मिळविण्यासाठी काही ठिकाणी कमी दर्जाचे पदार्थ वापरले जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. तसेच, ही तपासणी मोहीम केवळ दिवाळीपुरती मर्यादित न राहता दर महिन्याला किंवा वेळोवेळी केली जावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.