मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. मात्र, या ऐतिहासिक घटनेबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा नव्हे, तर लाच देऊन सुटका करून घेतली असा दावा केला आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोलापूरकर यांचा दावा नेमका काय?
राहुल सोलापूरकर यांनी “मुक्काम पोस्ट मनोरंजन” या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,
“पेटारे-बिटारे असं काही नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्याहून सुटका केली. त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला व त्याच्या पत्नीला लाच दिली. याचे ऐतिहासिक पुरावे माझ्याकडे आहेत. महाराजांनी मोहसीन खान (किंवा मोईन खान) याच्याकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र घेतलं आणि त्याच्याच मदतीने आग्र्याहून बाहेर पडले.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुनावले खडे बोल
सोलापूरकर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी लिहिले की,
“हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचे व्यक्तिमत्त्व अस्तित्वात नव्हते, हे सांगणारे आता छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुटले, असं सांगत आहेत. इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा महामूर्ख कोण? महाराष्ट्राला हा माणूस इतिहास शिकवतो आहे का?”
शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट!
आव्हाड यांनी पुढे लिहिले की,
“छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. अशा फडतूस लोकांचा तीव्र निषेध केला पाहिजे. या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे! शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत. रायगडावर नेऊन हिरकणी बुरुज कुठे आहे ते दाखवावे लागेल.”
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
राहुल सोलापूरकर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी इतिहास विकृत केल्याचा आरोप केला आहे. काहींनी त्यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे, तर काहींनी त्यांच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत.