Nashik : शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी महापालिकेच्या डिजिटल व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. महापौर Himgauri Adke यांनी ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांच्या तक्रारींवर 24 तासांच्या आत प्राथमिक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
ई-कनेक्ट अॅपमध्ये होणार मोठे बदल
कधी काळी अत्यंत प्रभावी मानले जाणारे Nashik महापालिकेचे ई-कनेक्ट अॅप सध्या नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत महापौर हिमगौरी आडके यांनी डिजिटल सिस्टीममध्ये व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन प्रणालीमध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर संबंधित विभागाने 24 तासांच्या आत प्राथमिक प्रतिसाद देणे बंधनकारक असेल. तसेच ठरावीक कालावधीत तक्रारीचे निवारण न झाल्यास ती तक्रार स्वयंचलितपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग केली जाणार आहे.
Nashik ई-गव्हर्नन्स सुधारणा बैठकीत महत्त्वाचे निर्णय
महानगरपालिकेमध्ये सोमवारी ई-गव्हर्नन्स आणि नागरिक सेवा सुधारणा संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील नागरिकांना अधिक पारदर्शक, जलद आणि जबाबदार प्रशासन देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाच्या ‘राईट टू सर्व्हिसेस’ अॅपच्या धर्तीवर महापालिकेतील विविध विभागांच्या सेवा निश्चित कालमर्यादेत नागरिकांना उपलब्ध करून देण्याची प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक विभागासाठी सेवा वितरणाची ठरावीक वेळ निश्चित केली जाणार असून त्या कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक असेल.
नागरी सुविधांसाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म
महापौरांनी शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था, कर प्रणाली आणि इतर नागरी सुविधांसाठी एकात्मिक ई-गव्हर्नन्स प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नागरिकांना विविध सेवांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
नवीन डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांच्या तक्रारींचे ट्रॅकिंग, कामांची पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.